सुभाषितप्रशंसा
दोनचार हजार
वर्षांपासून चालत आलेली संस्कृत सुभाषिते हा केवळ अभ्यास करण्याचा विषय नाही, तर त्यांत
शहाणपणा, व्यावहारिक ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन जीवनात कसे
वागावे याचे उत्तम मार्गदर्शन चपखल उदाहरणांसह, केवळ दोन ओळींत सामावलेले असते.
एकेका
विषयावरील दोन-तीन सुभाषिते, त्यांचा मी मराठी काव्यपंक्तीत केलेला अनुवाद, (
समश्लोकी असेलच असे नाही) आणि सविस्तर अर्थ असे या सदराचे स्वरूप असेल. तर चला, लुटूया
हे रत्नभांडार.
सुरुवात करूया
सुभाषितांचा महिमा सांगणाऱ्या काही सुभाषितांनी
१)
नायं प्रयाति
विकृतिं विरसो न यः स्यात्
न क्षीयते बहुजनैर्नितरां निपीतः |
जाड्यं निहन्ति रुचिमेति करोति तृप्तिं
नूनं सुभषितरसोsन्यरसातिशायी ||
कधीहि नासत नाही, चव याची
बिघडत नाही,
करोत प्राशन कितिही, तरीही हा संपत नाही.
अज्ञान करी हा दूर, गोडीने करतो तृप्त,
सुभाषिताचा रस हा, रस यापरि दुसरा नाही.
अर्थ - सुभाषितातील रस हा इतर रसांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे सांगताना
सुभाषितकार म्हणतो – हा रस म्हणजेच यातील ज्ञान कधीही नासत नाही,( कालबाह्य होत
नाही) बेचव होत नाही, कितीही जणांनी तो रस, ते ज्ञान ग्रहण केले, त्याचा आस्वाद
घेतला तरी तो रस कमी होत नाही. अज्ञान, मूढता, मंदपणा दूर करणारा हा रस इतका मधुर आहे की पिणारा अगदी
तृप्त होतो.
२)
पृथिव्यां
त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् |
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञाम् विधीयते ||
पृथ्वीवर या तीनच रत्ने, पाणी, अन्न, नि सुभाषिते,
परि दगडांच्या तुकड्यांना मूढ व्यक्ति रत्ने म्हणते.
अर्थ - सुभाषितांचे महत्त्व अधोरेखित करताना सुभाषितकार
म्हणतो की पृथ्वीवर जीवनाला आवश्यक अशी फक्त तीन रत्ने म्हणजेच मौल्यवान गोष्टी
आहेत – पाणी, अन्न आणि सुभाषिते, पण मूर्ख माणसे मात्र केवळ दगडांच्या तुकड्यांना
रत्ने म्हणतात आणि त्यांच्या हव्यासापायी आयुष्य वाया घालवतात.
३)
संसारकटुवृक्षस्य
द्वे फले ह्यमृतोपमे |
सुभाषितरसास्वादः सङ्गतिः सुजनैः सह ||
अमृतापरी दोन फळे ही संसाराच्या कटु वृक्षाची,
सुभाषितांचा रसास्वाद अन संगत सज्जन, साधुजनांची.
अर्थ - सुभाषितकाराने संसाराला कटू – कडू वृक्ष म्हटले आहे.
त्या वृक्षाची इतर सर्व फळे – म्हणजेच अनंत अडचणी, दुःखे - कडू असतात पण ती दुःखे,
त्या अडचणी सुकर करू शकतील अशी दोनच अमृतासारखी फळे या वृक्षाला आहेत – एक म्हणजे
सुभाषितांचा आस्वाद घेणे – म्हणजेच त्यांतून बोध घेऊन वागणे आणि दुसरे म्हणजे सज्जन,
सत्प्रवृत्त, सदसद्विवेकी लोकांच्या संगतीत राहणे.
या तिसऱ्या सुभाषितात सुभाषितकाराने सज्जनांच्या संगतीत राहावे
असे सांगितले आहे. हे सज्जन म्हणजे कोण, त्यांची लक्षणे काय, त्यांना कसे ओळखावे हे
पुढच्या भागात
पाहूया.