दैनंदिन जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दैनंदिन जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १९ मार्च, २०२५

असामान्य सामान्य २०२५/३

 

                              असामान्य सामान्य


आपल्याला रोज कित्येक माणसं भेटत असतात. काही ओळखीची, काही अनोळखी. काही प्रत्यक्ष भेटतात तर काही कुणाच्या सांगण्यातून. अशाच प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भेटलेल्या, लौकिकार्थाने सामान्य समजल्या जाणाऱ्या माणसांच्यात मला जे असामान्यत्व जाणवलं ते मला खूप समृद्ध करून गेलं.

                                

एका लहान गावात माझा ‘चर्पटमंजिरी’ हा एकपात्री कार्यक्रम होता. गावातल्या प्रतिष्ठित घरी माझी उतरायची सोय केली होती. राहायचं नव्हतं, पण गावात पोचल्यावर जेवणखाण, जरा आराम करण्याची सोय त्यांच्याकडे होती. त्यांचा मुकुंद नावाचा ड्रायव्हर कम नोकर मला रेल्वे स्टेशनवर न्यायला आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी न्यायलाही तोच होता. माझ्याबरोबर काही सीडीज् होत्या. मी मुकुंदला विचारलं, ‘ बाहेर एक टेबल लावलं तर तू सीडीज विकशील का?’ तो हो म्हणाला. मी सीडीजची संख्या, किंमत वगैरे लिहून पिशवी त्याच्या ताब्यात दिली.

कार्यक्रम छान झाला. गावातली सगळी मान्यवर, प्रतिष्ठित कुटुंबं आली होती. कार्यक्रम संपल्यावर तिथेच जेवून स्टेशनवर जायचं होतं. मुकुंद गाडी घेऊन तयार होताच. त्याने आधी सीडीजचा हिशोब दिला. आम्ही स्टेशनवर गेलो. गाडी यायला वेळ होता. मी एक सीडी काढून मुकुंदला दिली. म्हटलं, ‘ ही तुला भेट.’

तो म्हणाला, ‘  ताई, सांगणारच नव्हतो, पण आता सांगतो. हिशोब करताना माझ्या लक्षात आलं की एका सीडीचे पैसे कमी आहेत. गर्दीत कोणीतरी पैसे न देता उचलली असणार. मग मी तिथल्या वॉचमनची सायकल घेऊन घरी गेलो, तेवढे पैसे आणले आणि तुम्हाला बरोबर हिशोब दिला.

मी अवाक.’ अरे, तू तुझ्या खिशातले पैसे कशाला दिलेस?’

‘असं कसं ताई? तुम्ही माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली होती. नेमके माझ्याजवळ काहीच पैसे नव्हते, म्हणून घरी जावं लागलं. तुम्ही जेवत होतात तोपर्यंत घरी जाऊन आलो.’

‘ अरे पण तुझ्याकडे गाडी होती तर सायकल का घेऊन गेलास?’

‘छे छे! माझ्या कामासाठी मालकांची गाडी कशी वापरायची? ‘

‘मग तुझं जेवण?’

‘राहू दे हो ताई, जेवणाचं काय एवढं! तुमचा इतका सुंदर कार्यक्रम ऐकूनच पोट भरलं माझं.’

मी त्याला सीडीचे पैसे दिले. तो घेताच नव्हता, पण बळजबरीने दिले. तिथे स्टेशनवर वडापावची गाडी होती तिथून त्याला वडापाव घेऊन दिला, खायला लावला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, पण खरी हल्ले होते मी.

तथाकथित प्रतिष्ठित, श्रीमंत जमावातल्या कोणीतरी हातोहात सीडी लांबवली होती आणि या गरीब माणसाला इमान,विश्वास महत्त्वाचा वाटत होता. त्यासाठी स्वतःच्या पदराला खर लावायचीही त्याची तयारी होती.

कोणाला श्रीमंत म्हणायचं, कोणाला गरीब?


                                    

रोज घरी येणारा दूधवाला,पोस्टमन, पेपरवाला यांचं,एका संस्थेचा प्रतिनिधी एवढंच आपल्या लेखी अस्तित्व असतं. पत्र मिळाल्याशी कारण, तो पोस्टमन गोरा की काळा याच्याशी आपल्याला फारसं देणंघेणं नसतं. हल्ली ईमेल, व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात तर बिचाऱ्या पोस्टमनची कुणी वाटही पाहत नाही. पण पोस्टमनची एक व्यक्ती म्हणून दखल घ्यायला लावणारी एक घटना माझ्या बाबतीत बऱ्याच वर्षांपूर्वी घडली.

२००२ साली आम्ही तीन मैत्रिणींनी मिळून केलेल्या युरोपच्या अनोख्या कार ट्रीपबद्दलची माझी लेखमाला एका दैनिकात प्रसिद्ध झाली. अनेकांनी ती वाचून मला पसंतीची पावती दिली. पण मला आश्चर्याचा धक्का दिला तो एका पोस्टमनने. रोज दाराखालून पत्रे सरकवून जाणाऱ्या पोस्टमनने त्या दिवशी बेल वाजवली. मला वाटलं रजिस्टर असेल किंवा एखाद्या पत्राला कमी पैशाचं तिकीट लावलं असेल. पण तो म्हणाला, ‘ ताई, मी तुमचे सगळे लेख वाचले. अतिशय आवडले. मुद्दाम सांगावंसं वाटलं म्हणून बेल वाजवली.’ मी थक्क. त्याला आत बोलावलं. प्यायला ताक दिलं. तो सांगायला लागला. ‘ मी कॉलेजमध्ये असताना कविता करायचो. एक कवितासंग्रह प्रकाशित होण्याच्या बेतात असतानाच घराला आग लागली. इतर सामानाबरोबर कविताही जाळून गेल्या. मग पुढे पोट पाठीमागे लागलं आणि सगळंच राहून गेलं. पण काही चांगलं वाचलं, ऐकलं, की दाद दिल्याशिवाय राहवत नाही. बरं, येतो ताई.’ असं म्हणून तो सायकल मारत उन्हातून निघून गेला. तेव्हापासून तो निवृत्त होईपर्यंत आमची साहित्यिक मैत्री होती.

                                                                                                                                                    

एका गावातल्या जमीनदारांचा हृद्य किस्सा ऐकला. जमीनदार सुमारे सत्तरीचे. आता इनामं जरी गेली असली तरी गावात त्यांची जबरदस्त पत होती. अडल्यानडल्याचे कैवारी होते. भरपूर शेती होती, राबणारी कुळंहोती, सुबत्ता होती.

अचानक एक धक्कादायक बातमी कळली. इनामदारांना सारखा ताप येत होता म्हणून तपासणी केली तर निदान झालं रक्ताच्या कर्करोगाचं. जेमतेम चार-सहा आठवडे मिळतील असं डॉक्टर म्हणाले. झालं! गावावर शोककळा पसरली. पण इनामदार माणूसच वेगळा! त्यांनी गावकऱ्यांना बोलावून सांगितलं ,’ गड्यांनो, मी काही आता राहत नाही. बोलावणं आलं, जायला पाहिजे. तुमचा निरोप घेता येतोय हे काय कमी आहे? असं करा, येत्या शनिवारी सगळ्या गावाने वाड्यावर जेवायला यायचं. फक्कड मेजवानी करू या.

गावकरी रडायला लागेल, ‘ धनी, काय बोलताय? ही काय मेजवानीची वेळ आहे होय?’ इनामदार हसून म्हणाले, ‘ अरे माणूस गेल्यावर तेराव्याचं जेवण घालतात ना, ते मी आत्ताच घालतोय. माझी माणसं माझ्या डोळ्यादेखत पोटभर जेवताना बघून किती समाधान वाटेल मला!’

काय कमाल कल्पना आहे नाही! हां, मात्र त्यासाठी काळीज वाघाचंच हवं!!!

 

 

आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

                                आणखी एक ( किती?) बळी! “ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण क...