ससा कासव शर्यतीची उरलेली गोष्ट
नमस्कार,
ससा कासव शर्यतीची गोष्ट लहानपणापासून आपण शेकडो वेळा ऐकली आहे. त्याचं तात्पर्य देखील आपल्याला चांगलं ठाऊक आहे. शर्यतीत कासव जिंकलं हे सर्वांना
माहिती आहे. पण शर्यत हरलेल्या सशाचं पुढे काय झालं असावं हे सांगणारी ही उरलेली अर्धी
गोष्ट नुकतीच वाचनात आली. लेखक माहित नाही पण खूप आवडली गोष्ट म्हणून सांगावीशी वाटली.
"सशाने वेगाने धावता धावता मागे
वळून पाहिलं, कासव दूरवर कुठेच दिसत नव्हतं. शर्यत ठरल्यापासून कासव सतत, सावकाश,
न थांबता शेकडो मैल चालण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल बढाया मारत होतं. सशाला
त्याला दाखवून द्यायचं होतं की तोही शेकडो मैल धावू शकतो आणि तेही वेगाने. त्यामुळे
शर्यतीच्या विचाराने त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. म्हणून झाडाची थंडगार सावली
दिसल्यावर सशाने थोडा वेळ विश्रांती घ्यायची ठरवली.
एक
छानसा लांबटगोल दगड निवडून त्यावर मऊसूत गवत पसरून तो सशाने उशाला घेतला आणि ताणून दिली. आजूबाजूला पानांची सळसळ,
पक्ष्यांची किलबिल, थोड्या अंतरावरून वाहणाऱ्या ओढ्याचा खळाळ - सतत वेगाने
धावण्याच्या उन्मादात आजूबाजूच्या इतक्या सुंदर जंगलाकडे त्याने कधी नीट पाहिलंच
नव्हतं. सगळच वातावरण इतकं सुखद होतं की लगेच त्याचा डोळा लागला.
त्याला स्वप्न पडलं की एका लाकडाच्या ओंडक्यावर झोपून तो ओढ्यातून वाहत चालला आहे.
किनाऱ्याजवळ आल्यावर त्याला एक लांब दाढी असलेले साधू महाराज दिसले. त्याच्याकडे बघून हसून त्यांनी विचारलं,
साधू - ‘
कोण आहेस बेटा तू?’
ससा - ‘
मी ससा आहे महाराज आणि मी कासवाशी शर्यत लावली आहे.’
साधू -‘ ती का बरं?’
ससा - मी सगळ्यात वेगाने धावू शकतो हे सिद्ध
करण्यासाठी.’
साधू -- ‘ ते
कशासाठी सिद्ध करायचं?’
ससा - म्हणजे काय! सरळ आहे. त्यामुळे मला पदक मिळेल, सन्मान मिळेल आणि सर्वात जास्त वेगाने धावणारा म्हणून
माझ्यानंतरही माझं नाव घेतलं जाईल.’
साधू - ‘ पन्नास – शंभर वर्षांपूर्वी सर्वात
वेगाने धावणाऱ्या हरणाचं नाव, किंवा सर्वात मोठ्या हत्तीचं, किंवा सर्वात बलशाली
सिंहाचं नाव तुला माहिती आहे का?’
ससा -- ‘ अं ---
नाही महाराज.’
साधू - ‘ आज तुला
एका कासवाने आव्हान दिलंय, उद्या एखादा साप देईल, परवा झेब्रा. मग काय ‘ मी
सगळ्यांपेक्षा जास्त वेगाने धावतो हे सिद्ध करण्यासाठी तू आयुष्यभर शर्यतच लावत
राहणार?’
ससा - ‘ हं – हा
विचार मी कधीच केला नव्हता.’
साधू -- ‘ तर मग
आता कर. शर्यत विसर. तुला आयुष्यात कशाने आनंद मिळतो हे शोध आणि ते कर.’
सशाला जाग आली. त्याला खूप शांत वाटत होतं.
तो निवांतपणे चालू लागला. वाटेत भेटणारा प्रत्येकजण विचारत होता, ‘ अरे तू इथे काय
करतो आहेस? शर्यत लावली होतीस ना? कासव जिंकलं की. तू हरलास.’
ससा हसून म्हणाला, ‘ कासवाला त्याचा विजय
लखलाभ. मला आता कोणतीच शर्यत लावायची नाही. मला शांतपणे माझं काम करत, प्रत्येक
क्षणाचा आनंद घेत आयुष्य जगायचं आहे.’
गोष्ट मी लिहिलेली नसली तरी त्यातून माझं जे विचारचक्र सुरू झालं ते असं-
मूळ गोष्टीपेक्षा या गोष्टीचं तात्पर्य अगदी वेगळं. पण विचार करायला लावणारं आहे, हो ना?
प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शर्यतीत धावतो आहे- ऊर फुटेस्तोवर. परीक्षेतले मार्क, पद, प्रतिष्ठा,पैसा, प्रसिद्धी, गाडीचं, फोनचं मॉडेल, वाहनांचा वेग - अगदी सगळ्या सगळ्या गोष्टींत 'मी कसा सगळ्यांच्या पुढे जाईन ही चुरस.
आता त्यात भर पडली आहे सोशल मीडियाची. फॉलोअर्स,सब्स्क्राइबर्स,व्ह्यूज, यांत चढाओढ. त्यासाठी रील्स बनवताना, सेल्फी घेताना जिवाचीही पर्वा नाही. मी इतरांपेक्षा आघाडीवर राहिलं पाहिजे- बस्स! कुठे जाणार आहोत आपण ही आघाडी घेऊन? लाख मोलाचा जीव असल्या क्षुल्लक स्पर्धेसाठी पणाला लावायचा? जे मिळवण्यासाठी इतका आटापिटा चालला आहे, ते मिळालं तर त्याचा उपभोग घ्यायला तरी वेळ आहे का?
लहानपणी आजीकडून एक गोष्ट ऐकली होती.
एका माणसाजवळ खूप अंथरूणं - पांघरुणं होती. त्याला वास्तविक एकच पुरणार होतं पण त्याला वाटलं सगळ्याचा उपभोग घेऊ. म्हणून तो सगळी अंथरूणं घालत बसला. शेवटचं घालेपर्यंत सकाळ झाली. त्याला झोपायलाच मिळालं नाही.
विचार करू या. जाऊ दे कासवाला पुढे. आपण आनंदाचे क्षण वेचू या.
मंज़िलें मिलीं नहीं, तो चलो, रास्ते बदल लेते हैं
वक़्त बदला नहीं, तो चलो, ख़्वाहिशें
बदल लेते हैं,
समय किसी के लिए रुकता नहीं,
जो मिला है, चलो, उसीको संवार लेते
हैं||
वाचकहो, पटलं,आवडलं तर कॉमेंट बॉक्समधे तसं नक्की लिहा.
आणखी कुठल्या विषयाबद्दल वाचायला आवडेल तेही लिहा. मी नक्की लिहायचा प्रयत्न करीन.
