रामनवमी - एक वेगळा दृष्टीकोन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रामनवमी - एक वेगळा दृष्टीकोन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ६ एप्रिल, २०२५

  




                                                                       रामनवमी

नमस्कार, सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान हा संपूर्ण श्रीराम परिवार वंदनीय. श्रीरामांबरोबर या सर्वांचीही आपण पूजा करतो. पण म्हणजे ‘आम्ही मूर्तींना स्नान घालतो, चंदन उटी लावतो, धूप-

दीप, नैवेद्य दाखवतो,रामरक्षा तोंडपाठ म्हणतो, ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा जप करतो, आणि या सगळ्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर टाकून हजारो लाईक्स मिळवतो, आणि हो, हे सगळं करताना आपल्या मागण्यांची यादी

त्याच्यापुढे सादर करायला विसरत नाही,’म्हणजे आम्ही रामभक्त म्हणवायला मोकळे झालो का? हे सगळं करताना मनात भाव आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे,

‘ मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे,

 देव बाजारचा भाजीपाला नाही रे.’

पण मग पूजा, नामजप करायचा की नाही? याचे उत्तर ज्ञानेश्वरीत मिळते.श्रीमद् ज्ञानेश्वरीच्या १२ व्या अध्यायात माउलींचा कृष्ण म्हणतो – 

या भवसागराचे भल्याभल्यांना भय वाटते, मग माझ्या भक्तांनाही भय वाटतेच. म्हणून मी ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला मार्ग दिला. जे विरक्त होते, त्यांना ध्यानमार्ग दिला, पण सगुण उपासनेची गरज असलेल्या भाबड्या भक्तांसाठी मी मूर्तींचे मेळावे मांडले आणि नामाच्या हजारो होड्या सोडल्या.

म्हणजेच नामजप, मूर्तीपूजा भगवंतानेच मान्य केली आहे. मात्र कर्मकांड, व्रतवैकल्ये यांत गुंतून न पडता भाव महत्त्वाचा, याचेही प्रतिपादन केले आहे. म्हणजेच सर्व साधकांचे ध्येय एकच- आत्मस्वरूपाचे ज्ञान – पण मार्ग वेगळे.

तुकोबा देखील म्हणतात – ‘सगुण निर्गुण नाही भेद, दोन्ही टिपरी एकच नाद’.

राम, कृष्ण, शिव, देवी, गणपती ही प्रत्येक देवता म्हणजे एकेका शक्तीचे, गुणाचे प्रतीक. पिंडी ते ब्रह्मांडी – ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने त्या सगळ्या शक्ती आपल्यात वसतातच. ज्या वेळी जी शक्ती पाहिजे असेल, तेव्हा त्या त्या देवतेचे स्मरण करून आपल्यातच वास करत असलेल्या शक्तीला आवाहन करणे म्हणजे त्या देवतेची पूजा, उपासना असे मला वाटते. श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, मूर्तिमंत विवेक, सत्यवचनी, मातृपितृभक्त, राजाची भूमिका निभावण्यासाठी स्वतःच्या सुखापेक्षा प्रजेच्या हिताला प्राधान्य देणारे. अन्याय, दुष्टपणा सहन न करणारे, दुष्टशक्तीचे निर्दालन करणारे. सीतामाई म्हणजे संपूर्ण समर्पण, लक्ष्मण म्हणजे सेवाभाव आणि हनुमान म्हणजे भक्तीची परिसीमा. हे सगळे गुण, या सर्व शक्ती आपल्याही अंतरात आहेतच. म्हणून ज्या ज्या वेळी या गुणांची गरज भासेल, तेव्हा या देवतांचे स्मरण, पूजन अर्चन करावे असा माझा दृष्टीकोन आहे.

या संदर्भातली तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास यांची एक कथा फार बोलकी आहे. हे दोघेही समकालीन. महाराष्ट्र धर्माचा प्रसार करण्यासाठी समर्थ भ्रमण करत असताना पंढरपुरी आले. तुकाराम महाराजांना चंद्रभागेच्या वाळवंटात उराउरी भेटले. तुकोबा त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन गेले. त्या साजिऱ्या मूर्तीचे ‘ सुंदर ते ध्यान’ असे वर्णन करून त्यांनी समर्थांना विचारले, ‘ योगिराजा, तुला कसा दिसतो माझा पांडुरंग?’ समर्थ एकटक त्या मूर्तीकडे पाहत राहिले. समर्थ रामाचे भक्त. विठ्ठलाच्या मूर्तीच्या हातात शस्त्र नाही. विठ्ठलाची मूर्ती ही समाजाच्या अत्यंत प्रगत, चौथ्या अवस्थेचे प्रतीक आहे, असे विनोबा भाव्यांचे प्रतिपादन आहे. 

पहिली अवस्था म्हणजे शासनकर्ताच नाही, दोघांचे भांडण झाले तर एकमेकांनाच धोपटायचे. 

दुसरी अवस्था म्हणजे राजा किंवा नेत्याने ते भांडण सोडवायचे, 

तिसरी अवस्था म्हणजे देवाने न्यायनिवाडा करायचा आणि शासन करायचे, ( याचा अर्थ सदसद्विवेक जागृत असलेला समाज, अंतःस्थ ईश्वराकडून शिक्षा.) 

आणि चौथी अवस्था म्हणजे देवाचाही शस्त्रसंन्यास. शिक्षा करावी असा प्रसंगच उद्भवणे नाही. 

पण तो काळ मोंगलांच्या अत्याचाराचा होता. विठ्ठलाच्या त्या निःशस्त्र मूर्तीपेक्षा समर्थांना दुष्टशक्तीचा संहार करणारा धनुर्धारी राम हवा होता. त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द उमटले-

येथे का रे उभा श्रीरामा | मनमोहन मेघश्यामा ||

चापबाण काय केले | कर कटावरी ठेविले ||

का बा धरिला अबोला | दिसे वेष पालटीला ||

काय केली अयोध्यापुरी | येथे वसविली पंढरी ||

सध्या आपण समाजाच्या कितव्या अवस्थेत आहोत याची आपल्या सगळ्यांनाच पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे अद्याप देवाच्या शस्त्रसंन्यासाची वेळ आली नाही हे निश्चित. आज सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती विवेकी, चारित्र्यवान, योग्य तिथे शासन करणाऱ्या नेतृत्वाची, आणि आपल्याही प्रत्येकाच्या अंतरातल्या या गुणांना, शक्तींना आवाहन करण्याची, म्हणूनच हे सर्व गुण असणाऱ्या श्रीरामाचे अधिक महत्त्व ! 

                                                                                 जय श्रीराम !!

आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

                                आणखी एक ( किती?) बळी! “ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण क...