रविवार, १६ मार्च, २०२५

"शुद्धमती " blog no 2025/2

 


                                             


                                                शुद्धमती

‘नवक्षितिज’ – डॉ नीलिमा आणि डॉ चंद्रशेखर देसाई यांनी मतिमंद प्रौढांसाठी स्थापन केलेली निवासी संस्था. दोघेही आमचे जवळचे मित्र असल्यामुळे या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली तेव्हापासून आजपर्यंतची वाटचाल जवळून बघितलेली. आज नवक्षितिजच्या २१ व्या वर्धापन दिनाला गेले असताना तो सर्व पट नजरेसमोरून तरळून गेला. शेखर-निलीमाची धाकटी मुलगी अदिती मतिमंद. तिचा पूर्णपणे स्वीकार करून तिच्यासारख्या इतर मुलांची १८ वर्षानंतर संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यासाठी नवक्षितिज उदयाला आली. त्यांना केवळ अन्न,वस्त्र, निवाराच नव्हे तर उदंड प्रेम आणि त्यांना त्यांचे आयुष्य सन्मानाने, क्रियाशीलतेने आणि अतिशय आनंदाने जगता येईल अशा सोयी हे नवक्षितिजचे वैशिष्ट्य. इथे आज साठीच्या घरात असलेली ‘मुले’ही आहेत. आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काहींनी सादर केलेले देशभक्तीपर, पर्यावरणाचा संदेश देणारे कार्यक्रम बघताना त्यांचे शिक्षक आणि काळजीवाहक यांच्यापुढे आपोआपच मान झुकली. या सगळ्या प्रवासात नीलिमा एका अतर्क्य आजाराने सर्वांना सोडून गेली पण तिने आरंभलेले कार्य थांबले नाही. संस्था चालवणारे सर्वजण, तिथे राहून काम करणारे कर्मचारी, काळजीवाहक, त्यांची क्षुधाशांती करणाऱ्या अन्नपूर्णा- सर्वांना सलाम आहे.

आज स्टेजवरचा त्या ‘मुलांनी’ सादर केलेला सुंदर कार्यक्रम बघताना आणखी एक आठवण जागी झाली.

काही वर्षांपूर्वी कामायनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणी या नात्याने उपस्थित राहण्याचा योग आला. १९६४ मध्ये सिंधूताई जोशींनी मतिमंद मुलांसाठी सुरु केलेल्या या शाळेची निगडीला एक शाखा आहे. त्या शाखेचे स्नेहसंमेलन होते. सर्व कार्यक्रमांचे सूत्र होते – ‘नाती.’ त्यात वडील-मुलगा, गुरु - शिष्य, पैलवान – माती, गाव- गावकरी, देश – देशवासीय, देव- भक्त, निसर्ग- माणूस अश्या विविध नात्यांवर कार्यक्रम बसवलेले होते. दिव्यांग मुलांचे कार्यक्रम म्हणजे ‘ अशी असून सुद्धा त्या मानाने चांगले करताहेत’ असा जास्त कौतुकाचाच भाग असणार अशी धारणा, पण कार्यक्रम सुरु झाले आणि त्यात त्या मुलांची त्या त्या जागेवर उभे राहण्यातली अचूकता, शिकवलेल्या हालचाली तंतोतंत करण्याची धडपड, समरसता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले निर्व्याज हसू,हे बघताना माझ्या डोळ्यांना धारा केव्हा लागल्या माझे मलाही कळले नाही.

मुलांचे पोषाख, नेपथ्य, संगीत सगळेच उत्तम जमून आले होते. ते त्या मुलांकडून बसवून घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे तितके थोडेच. विशेष म्हणजे कार्यक्रम चालू असताना एकही शिक्षक/शिक्षिका स्टेजवर तर नाहीच, पण विंगमध्ये सुद्धा उभे नव्हते. कोणाचे चुकले तर मुलेच त्याला कसे करायचे ते हसत हसत दाखवत होती. देशाचे नाते दाखवताना तर मुले हातात २६/११ च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांचे फोटो असलेला फ्लेक्स घेऊन आली. सगळ्या हॉलने उभे राहून मानवंदना दिली.

 कामायनीचे वर्कशॉप आहे, त्यातील मुला-मुलींनी फिल्मी गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यांची तालाची, लयीची समज बघून थक्क व्हायला झालं.

सलग ५ तास गाऊन रेकॉर्ड केलेला दिव्यांग मुलगा पृथ्वीराज इंगळे याचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. त्याची आई सांगत होती की लिहिता वाचता येत नसूनही त्याला शेकडो गाणी पाठ आहेत. कुठूनही मधून म्युझिक लावलं तरी बरोब्बर तो ते गाणं सुरु करतो.

फक्त त्याला युगुलगीत म्हणता येत नव्हतं कारण आपण थांबायचं आणि गायिकेला गायला द्यायचं हे त्याला समजत नव्हतं. मग त्याची आई त्याला एखाद्या युगुलगीताचा व्हिडीओ दाखवायची, हिरोसारखे कपडे त्याला घालायची, हिरोईनचे कपडे स्वतः घालायची आणि मग तिचा भाग आला की त्याला थांबवून स्वतः गायची. त्यामुळे आता तो युगुलगीतेही उत्तम प्रकारे म्हणू शकतो.

खरोखरच धन्य आहे पालकांची, शिक्षकांची, मुलांना शाळेत नेण्या- आणणाऱ्या बसचालक-वाहकांची, इतर मदतनिसांची आणि अर्थातच अत्यंत निरागस असणाऱ्या या मुलांची. अर्थात त्यांचेही भावनांचे चढ उतार, रुसून बसणे असणारच पण मला वाटते ते क्षणिक असणार. कामायानीतल्या त्या मुलांना आणि नवक्षितिजमधल्या प्रौढांना बघताना मला सारखे जाणवत होते की परमेश्वराने त्यांना जसे जन्माला घातले त्या शुध्द स्वरूपातच ती आजही आहेत. आपल्यासारख्या तथाकथित बुद्धिमंतांप्रमाणे राग,लोभ,द्वेष,मत्सर यांची गाठोडी त्यांनी निर्माण केलेली नाहीत.

त्यामुळे त्यांचे प्रेम निरपेक्ष आहे. म्हणूनच त्यांना मंदमती म्हणण्याऐवजी ‘शुद्धमती’ म्हटले पाहिजे.

गुरुवार, १३ मार्च, २०२५

असे कलाकार असे रसिक २०२५/१

 




                                                                                                                                             असे कलाकार- असे रसिक

पं प्रभाकर कारेकर कालवश झाल्याची बातमी वाचली आणि खोल स्मृतिसागरातली सुमारे ५५ वर्षांपूर्वीची एक स्मृती तरंगत वर आली.

माझे वडील- त्या काळचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ ह ना फडणीस हे शास्त्रीय संगीताचे अत्यंत शौकीन. श्री क्लिनिक –या आमच्या हॉस्पिटलच्या वरच आमचे घर होते. घरातच गाण्याच्या मैफली करता याव्यात यासाठी आमचा दिवाणखानाच बाबांनी १८ फूट *४०फुटांचा बांधून घेतला होता, त्या मापाचे रुजामे बनवून घेतले होते. अनेक मोठमोठ्या गायकांच्या मैफली आमच्या घरी होत असत. सर्व व्यवस्था करण्यात माझ्या आईची अर्थात साथ होतीच.

पं प्रभाकर कारेकर हे सगळ्यांच्याच आवडीचे गायक. अत्यंत धारदार आवाज, कमालीचा फिरता गळा, यामुळे ते रसिकांच्या गळ्यातला ताईत होते. सवाई गंधर्व महोत्सवात तर ‘प्रिये पहा’- हे नाट्यगीत म्हटल्याशिवाय श्रोते त्यांना उठूच द्यायचे नाहीत.

आमच्या घरीही त्यांची मैफल झाली होती. चांगली ओळख होती.

एकदा मॉडर्न हायस्कूलच्या मैदानावर रात्री पं प्रभाकर कारेकर यांचे गाणे होते. आई-बाबा गेले होतेच. मैफल सुरू झाल्यावर थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. थोडा वेळ वाट पाहिली पण कमी होण्याचे काही चिन्ह दिसेना. सगळ्यांचाच हिरमोड झाला. पण तेवढ्यात आई-बाबांच्या काही कानगोष्टी झाल्या आणि बाबा पुढे जाऊन म्हणाले, “ पंडितजी आणि इतर सगळ्यांची तयारी असेल तर मला अर्धा-पाउण तास द्या. उरलेली मैफल आमच्या घरी होईल.” हे ऐकून अर्थातच सर्वांना सुखद आनंदाचा धक्का बसला. पंडितजींनी होकार दिला. आई-बाबा लगेच घरी गेले. घरच्या-हॉस्पिटलच्या नोकर-चाकरांना घेऊन हॉलमधले फर्निचर हलवून रुजामे घालून घेतले. आयोजकांनी ध्वनिव्यवस्था वगैरे इतर व्यवस्था केली.

बरोबर पाऊण तासाने पं प्रभाकर कारेकर गायला बसले आणि श्रोत्यांना अमृतानुभवाची पर्वणी लाभली. घरात इतक्या लोकांना पुरेल एवढ्या कॉफीसाठी दूध नसल्यामुळे आणि सगळी दुकाने बंद झाली असल्यामुळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे श्रोत्यांना खास ‘गाण्याची कॉफी’ देता आली नाही याबद्दल आईने दिलगिरी व्यक्त केली. पण ती मैफल इतकी रंगली की सर्वांची तहानभूक  हरपली होती. (हे सगळे तपशील अर्थात नंतर कळले. त्यावेळी मी लहान होते.)

ऑगस्ट २००२ मध्ये बाबा गेले. नंतरचे दिवस वगैरे काही करायचेच नव्हते. समाजात नाव मिळवलेल्या व्यक्तींसाठी सहसा शोकसभा भरवतात. पण बाबांसाठी आम्ही ‘शौकसभा’भरवायचं ठरवलं. त्यासाठी पं कारेकरांशिवाय दुसऱ्या नावाचा विचारही कोणाच्या मनात आला नाही. अतिशय हृद्य वातावरणात उत्तम मैफल झाली.

त्या रात्री अगदी झोप लागताना मला पाठीवर एक शाबासकीचा हात जाणवला. भरून पावले.

आता सगळे स्वर्गस्थ रसिक पंडितजींच्या मैफिलीचा चिरंतन आनंद घेतील.

मंजिरी धामणकर 

पंडितजींनी गायलेल्या या नाट्यगीताचा आस्वाद घ्या.




बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

रंजिश ही सही २०२४/१०

 



नमस्कार 

उर्दू गझल शायरी सर्वांना आवडतेच पण मराठी रसिकांना त्या शायरीचा पूर्ण अर्थ कळतोच असं नाही. म्हणून काही गझलांचा मी त्याच चालीत मराठी अनुवाद केला आहे. 

'रंजिश ही सही' ही गझल सगळ्यांच्याच आवडीची, पण पहिल्याच 'रंजिश' या शब्दाचा अर्थ कदाचित माहित नसेल. रंजिश म्हणजे कटुता. एखादं नातं बिघडलं की निर्माण होणारा दुरावा. 

ही मूळ गझल आणि मी तिचा केलेला मराठी अनुवाद देत आहे. मी गायलेल्या व्हिडीओची लिंक देखील आहेच. 

वाचता वाचता एकता येईल, ऐकता ऐकता वाचता येईल. प्रतिक्रियांचं अर्थातच स्वागत आहे. 

 ग़ज़ल -

रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए आ 

आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ ||

पहले से मरासिम न सही, फिर भी कभी तो 

रस्मो-रहे-दुनिया ही निभाने के लिए आ ||

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत 

चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ ||

इक उम्र से हूँ लज्ज़ते गिर्यां से भी महरूम 

ऐ राहते जां मुझको रुलाने के लिए आ ||

जैसे तुझे आते हैं न आने के बहाने 

ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ ||


मराठी अनुवाद -

भंगली जरी प्रीत, छळायास तरी ये 

ये फिरुनि मजसि दूर करायास तरी ये||

उरली जरी नाही तुला ती ओढ जुनी ग 

जनरीत म्हणुनि क्षेम पुसायास तरी ये ||

खुलते खरी प्रीती जरी मुग्धाच अबोली

हलकेच नजरभेट घडायास तरी ये ||

ओठंगले नेत्रातळी अश्रूही कधीचे

एकवार त्या सरींत भिजयास तरी ये ||

सुचती मला टाळायचे तुज लाख बहाणे 

एकदा सखे चिरकाल राहायास तरी ये||




 

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

प्रौढ लेकरू Blog no. 2024/9

 





                                                                  "प्रौढ लेकरू "

खेड्यामधले घर कौलारू हे गदिमांचं भावपूर्ण भावगीत - अगदी त्या घराचं मूर्तिमंत चित्र

त्यातल्या नादांसकट डोळ्यापुढे उभं करणारं. विशेषतः त्यातलं

“माजघरातिल उजेड मिणमिण

वृध्द काकणे करिती किणकिण

किणकिण ती हळू ये कुरवाळू

दूरदेशीचे प्रौढ लेकरू”

हे शेवटचं कडवं तर स्वतः प्रौढ झाल्यावर जास्तच जवळचं झालं. खरंच, जोपर्यंत मोठीमा णसं घरात, आसपास आहेत तोपर्यंत आपलं वय कितीही झालं तरी लेकरूपण संपत नाही, खूप छान उबदार वाटत राहतं. हे भाग्य परमेश्वराने भरभरून माझ्या पदरात घातलंय. आई वडील, सासू, सासरे यांच्याबरोबरच इतर ज्येष्ठ नातेवाईक, ओळखीचे यांचा खूप स्नेह लाभला,आजही लाभतो आहे. माझ्या माम्या,आत्या, मावश्या, काकू यांनी तर लाड केलेच पण माझ्यासासूबाईंच्या बहिणी, वहिन्या यांच्याकडून ही मला भरपूर प्रेम मिळालं, मिळतं आहे.

नातं नसलेल्या अनेकांनीही या प्रौढ लेकरावर माया केली आहे.

आमचे फॅमिली फ्रेंड इन्स्पेक्टर नाईक पोलिस दलातून निवृत्त झालेले. करारी, कडक शिस्तीचेभोक्ते. तोंडावर कधी कौतुक नाही करणार पण मनात उदंड प्रेम. नेहमी पेरू घेऊन यायचे.त्यात मला आवडतो म्हणून एक कडक पेरू नक्की असणारच. “घ्या, दगड आणलायतुमच्यासाठी. दात बीत पडले तर मला सांगू नका” ही वर पुस्ती.आमच्या घरासमोर राहणाऱं सोमण कुटुंब म्हणजे धामणकरांचे लोकमान्यनगर पासूनचे सख्खे शेजारी. सोमण आजी – त्यांना सगळे मम्मी म्हणायचे- अत्यंत प्रेमळ. आमच्या घरातल्या सगळ्यांचे वाढदिवस त्यांच्या लक्षात असायचे. फोन तर करायच्याच पण त्या त्या व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ स्वतः करून घेऊन यायच्या. एकदा मम्मींनी फोन केला. म्हणाल्या येऊन जा. मी गेले. मनात उत्सुकता होती का बर मुद्दाम बोलावलं असेल? माझ्यासमोर गळ्यातल्या कानातल्याचे बरेच सेट्स ठेवले आणि म्हणाल्या “ घे कुठलं आवडेल ते”. “अहो पण हे कशासाठी आत्ता”? तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणीच आलं.

त्यांचे यजमान – पपा- जाऊन बरीच वर्षं झाली होती. माझं लग्न व्हायच्या कितीतरी आधी ते गेले होते. मी त्यांना पाहिलंच नव्हतं.

“पपांना डॉ. धामणकरांच्या ओळखीने तुझ्या वडिलांच्या हॉस्पिटल मध्ये- श्री क्लिनिक मध्ये नोकरी लागली होती. तेव्हा तू खूपच लहान- आठ- दहा वर्षांची होतीस. हॉस्पिटलच्या वरच घर असल्यामुळे तू खाली येऊन सगळ्यांशी गप्पा मारायचीस, गाणी बिणी म्हणायचीस. पपांना तुझं खूप कौतुक होतं. मला एकदा म्हणाले, “इतकी चुणचुणीत मुलगी आहे. पुढे नक्की नाव कमावणार बघ. मला तिला काहीतरी द्यायचंय. तू जरा तिच्यासाठी छान बांगड्या घेऊन ये.”

पण काही न काही कारणाने त्या बांगड्या काही आणल्या गेल्या नाहीत. पुढे पपा गेलेच. आता तुझे इतके कार्यक्रम होतात, पेपरमध्ये नाव फोटो बघून मला तेव्हाची आठवण झाली. म्हटलं पपांची तेव्हाची राहिलेली इच्छा आता तरी पूर्ण करूया. म्हणून हे आणलंय. तुला आवडेल ते घे.”

आमच्या घरासमोर राहणाऱ्या लीलुताई जोशी- माझ्या सासूबाईची खास मैत्रीण. अप्रतिम चित्रकार. माझ्या चर्पट्मंजिरी या एकपात्री कार्यक्रमाच्या पाचशेव्या प्रयोगाला त्यांनी आपणहून दरवाज्यापाशी सुंदर रांगोळी काढली, त्यात माझ्याबद्दल कौतुकाच्या चार ओळी लिहिल्या.

माझा आतेभाऊ दोन वर्षांसाठी इंग्लंडला गेला होता. २००५ मध्ये त्याची आई – माझी उषाआत्या आणि मी त्याच्याकडे जाणार होतो. मुंबईहून दुपारी १ वाजता जेट एअरवेजची फ्लाईट होती. मी सकाळी पुण्याहून जेटच्याच फ्लाईट ने गेले. उषाआत्या मुंबईला जॉईन होणार होती. मी मुंबईला पोचून डोमेस्टिक वरून इंटरनॅशनल एअरपोर्टला जाऊन पुन्हा सिक्युरिटी वगैरे सोपस्कार करून विमानात बोर्ड करेपर्यंत जरा उशीरच झाला. आत जायच्या रांगेत उभ्या असताना मी सहज आत्याला म्हटलं, “ भूक लागली बाई, केव्हा सकाळी निघालीये. डोमेस्टिक फ्लाईट असल्यामुळे काही खायला पण दिलं नाही. आता ह्या फ्लाईटमध्ये लवकर खायला दिलं म्हणजे बरं.” तिकीट वेगळं वेगळं काढल्यामुळे तिची आणि माझी सीट जवळ नव्हती. एअरहोस्टेसला सांगितलं तर म्हणाली आत्ता बसून घ्या, नंतर बघू.आम्ही बसतो न बसतो तोच कुर्सी की पेटी बांधनेका संकेत बिंकेत सुरूच झालं. अचानक माझ्या खांद्यावर हात पडला. दचकून पाहिलं तर आत्याबाई पोळीचे रोल घेऊन उभ्या. मी काही म्हणायच्या आत ते माझ्या हातात देऊन ती परत फिरली. तेवढ्यात एअरहोस्टेस तिला ओरडलीच. इतर सगळेजण ही तिच्याकडे नाराजीने बघत होते. हे सगळं का, तर भाचीला भूक लागली होती म्हणून.

कमलमावशी- माझ्या आईची बालमैत्रीण. कॅनडा मधे राहणारी. दर वर्षी हिवाळ्यात चार महिने पुण्यात यायची. अत्यंत धमाल प्रकरण. मावशीपेक्षा मैत्रीणच जास्त.

२००७ मध्ये मी अमेरिकेला जाणार हे कळल्याबरोबर मावशीबाईंनी हुकूम केला. माझ्याकडे कॅनडाला आलंच पाहिजे. मी तुला नायगारा दाखवायला नेणार आहे. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आठवडाभर तिच्याकडे मस्त माहेरपण झालं. नायगाराची ट्रीप तर केवळ अविस्मरणीय. तिच्या घरासमोर एक केनेडियन कुटुंब राहायचं. जेफ, शॅरन आणि त्यांच्या तीन मुली. एकट्या राहणाऱ्या कमल मावशीला त्यांची खूप मदत होत असे. शॅरनच्या माहेरचं कुटुंब खूप मोठं. पीच,प्लम चेरीच्या बागा, फुलशेती असणारं प्रचंड खटलं. त्यांची इस्टेट नायगाराच्या वाटेवरच. तिने सांगितलं तिथे नक्की जा. आम्ही अर्थातच गेलो. त्यावेळी पीचचा सीझन होता. शॅरनच्या वहिनीने बागा दाखवल्या,फळांची तोडणी, प्रतवार निवड, पॅकिंग सगळ्या प्रक्रिया समजावून सांगितल्या, प्रत्यक्ष दाखवल्या. ग्रीन हाउसमधली फुलांची शेती बघून तर डोळ्याचं पारणं फिटलं. निघताना मालकीण बाईंनी प्रीमियम क्वालिटी पीचेसची एक छोटी करंडी भेट दिली. काय रसरशीत फळ. तोंडाला अगदी पाणी सुटलं पण हावरटासारखं लगेच त्यांच्या समोर खाणं वाईट दिसलं असतं म्हणून कशीबशी कळ काढली. पण गाडी त्यांच्या इस्टेटीच्या बाहेर पडल्याबरोबर मी फराळ सुरु केला. शप्पत सांगते तशी पीचेस मी त्यापूर्वी आणि नंतर ही आजतागायत खाल्ली नाहीत. इतकी रसाळ होती की खाता खाता कितीही जपलं तरी रस गळत होता. तिच्या गाडीतले सगळे टिश्यू पेपर्स संपले तरी आपलं माझं कोपरापर्यंत आलेला रस चाटणं चालूच होतं. आम्ही दोघीही इतक्या हसत होतो की शेवटी पोट दुखायला लागलं. खरंच मी अगदी एखाद्या स्वच्छंद, उन्मुक्त छोट्या मुलीसारखी वागत होते. कमल मावशी, त्या क्षणांसाठी तुझे किती आभार मानू!

नायगाराच्या आधी नायगारा ऑन द लेक नावाचं एक गाव लागतं. किती टुमदार आणि देखणं म्हणून सांगू! जुलै ऑगस्ट महिन्यात तिथे थिएटर फेस्टिवल्स होतात. लोक नटूनथटून नाटकाला चालले होते. मला जरा हेवाच वाटला. नायगाराला पोचलो. लहानपणापासून इतकं ऐकलेला नायगारा प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून मी अगदी खूष होते. पाहिला.अगदी डोळे भरून पाहिला. मेड ऑफ द मिस्ट, टनेल वॉक सगळं काही अनुभवलं. त्यावर एक कविताही झाली. आमची मावशी जगमित्र. चक्क नायगारा गावात सुद्धा तिची एक मैत्रीण राहते. तिच्याकडे आम्ही राहणार होतो कारण रात्री त्या धबधब्यावर रंगीबेरंगी प्रकाशझोत टाकतात ते मला दाखवल्याशिवाय मावशीला चैन कसं पडणार!

तिच्या गावी ग्वेल्फला परत आलो. रोज काही न काही गम्मत चालूच होती. माझा कार्यक्रमही तिने तिथे ठरवला होता. इंग्लंडमध्ये शेक्सपियरचं गाव स्ट्रॅटफोर्ड ऑन अ‍ॅव्हॉन जसं जतन केलय त्याची प्रतिकृति ग्वेल्फजवळ आहे. तिथे गेलो. तशीच कमनीय वळण घेतलेली नदी,विहार करणारी बदकं, त्यावरचे देखणे पूल, काठावरचे पाण्यात डोकावणारे वीपिंग विलोज, सगळं तसंच. एक दिवस एका सुंदर थिएटरमध्ये जाऊन एक म्युझिकल नाटक बघितलं.

नायगारा ऑन द लेक मध्ये नाटक बघता न आल्याचं शल्य काही अंशी कमी झालं.

तिच्या घरून निघताना म्हणाली पुढच्या वेळी दिलीपला घेऊन ये. नायगाराच्या काठावरच्या आलिशान हॉटेलमध्ये तुमच्यासाठी हनिमून सूट बुक करते. मात्र ते राहूनच गेलं. कमलमावशीने त्या आधीच जगातून एक्झिट घेतली.

गेल्या जन्मी मी बरंच पुण्य कमावलं असणार म्हणूनच या जन्मात इतकं उदंड प्रेम वाट्याला आलं. मी ही मग मनात आलं की सगळ्या आज्यांना गाडीत घालते. कधी नाटक बघून, कधी मस्त फिरून खाऊन पिऊन आम्ही परत येतो. त्या थोरांमुळे माझं सानपण टिकून आहे.

मध्यंतरी लेकीच्या घरी गेले होते. मी बाहेरच्या खोलीत होते. तिने आतून हाकमारली, “ आई, गरम पोळी खायला ये”. अरेच्या, इतकी वर्षं मी तिला जी हाक मारत आले ती हाक आज माझी लेक मला मारते आहे? खरंच की, साठी जवळ आली म्हणजे दुसरं बालपण सुरू झालं म्हणायचं----

नायगारा कविता –


नायगाऱ्यास,

खरं सांगू?

लांबून पाहिलं तेव्हा तू त्या बाजारी वातावरणात मनाला भिडला नाहीस.

जितकं ऐकलं होतं त्या मानाने प्रथमदर्शनी तितकासा भावला नाहीस.

तू तेव्हा नक्की मनात मला हसला असशील

‘आगे आगे देख होता है क्या’ म्हणाला असशील.

झालंही तसंच,

तुझी धुंदपरी (मेड ऑफ द मिस्ट बोट )मला तुझ्याजवळ घेऊन गेली,

आणि बघता बघता जादूची कांडी फिरली.

इंद्रधनुष्याची कमान ओलांडून तुझ्या प्रासादात प्रवेश केला,

अन धीरगंभीर ओंकाराने अंगावर रोमांच उमटला.

आधी काही चुकार तुषारांनी गुलाबपाणी शिंपडून स्वागत केलं,

मग मात्र पाहुणचाराच्या सरींनी अंगभर भिजवलं.

शुभ्र फेसाळते लोट आवेगाने झेपावत होते,

खाली फुटून फेसाळताना धुक्याचा पडदा विणत होते.

मग तुझ्या पोटात शिरून (टनेल वॉक) तुझं रहस्य जाणण्याचा प्रयत्न केला,

तेव्हा ओठी तेच पोटी हा अंतर्बाह्य निखळपणा अनुभवला.

रात्री रंगीबेरंगी प्रकाशझोतात तुला पाहिलं,

पण त्या कृत्रिम रंगात तुझं भारदस्त देखणेपण मुळीच नाही मावलं.

सूर्यकिरणांच्या रोषणाईशीच तुझ्या तारा जुळतात,

इंद्रधनुष्याचे अलंकार तुझं सौंदर्य शतगुणित करतात.

मी निघाले तेव्हा सहस्रावधी धारांनी माझा निरोप घेतलास,

‘माझं बर्फाळ तटस्थ रूप बघायला ये’ प्रेमळ आग्रह केलास.

तुझे खूप फोटो काढले इतरांना दाखवण्यासाठी,

माझ्या मनःपटलाची छबी मात्र फक्त माझ्यासाठी,

अगदी खास माझ्याचसाठी ||

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

सुभाषितप्रशंसा Blog no 2024/8

 







सुभाषितप्रशंसा 

दोनचार हजार वर्षांपासून चालत आलेली संस्कृत सुभाषिते हा केवळ अभ्यास करण्याचा विषय नाही, तर त्यांत शहाणपणा, व्यावहारिक ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे उत्तम मार्गदर्शन चपखल उदाहरणांसह, केवळ दोन ओळींत सामावलेले असते.

एकेका विषयावरील दोन-तीन सुभाषिते, त्यांचा मी मराठी काव्यपंक्तीत केलेला अनुवाद, ( समश्लोकी असेलच असे नाही) आणि सविस्तर अर्थ असे या सदराचे स्वरूप असेल.  तर चला, लुटूया हे रत्नभांडार.

सुरुवात करूया सुभाषितांचा महिमा सांगणाऱ्या काही सुभाषितांनी

                                                                                                                                                                                                                     

१)  नायं प्रयाति विकृतिं विरसो न यः स्यात्

न क्षीयते बहुजनैर्नितरां निपीतः |

जाड्यं निहन्ति रुचिमेति करोति तृप्तिं

नूनं सुभषितरसोsन्यरसातिशायी ||

 

कधीहि नासत नाही, चव याची बिघडत नाही,

करोत प्राशन कितिही, तरीही हा संपत नाही.

अज्ञान करी हा दूर, गोडीने करतो तृप्त,

सुभाषिताचा रस हा, रस यापरि दुसरा नाही.

 

अर्थ - सुभाषितातील रस हा इतर  रसांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे सांगताना सुभाषितकार म्हणतो – हा रस म्हणजेच यातील ज्ञान कधीही नासत नाही,( कालबाह्य होत नाही) बेचव होत नाही, कितीही जणांनी तो रस, ते ज्ञान ग्रहण केले, त्याचा आस्वाद घेतला तरी तो रस कमी होत नाही. अज्ञान, मूढता, मंदपणा  दूर करणारा हा रस इतका मधुर आहे की पिणारा अगदी तृप्त होतो.

 

२)  पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् |

मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञाम् विधीयते ||

 

पृथ्वीवर या तीनच रत्ने, पाणी, अन्न, नि सुभाषिते,

परि दगडांच्या तुकड्यांना मूढ व्यक्ति रत्ने म्हणते.

 

अर्थ - सुभाषितांचे महत्त्व अधोरेखित करताना सुभाषितकार म्हणतो की पृथ्वीवर जीवनाला आवश्यक अशी फक्त तीन रत्ने म्हणजेच मौल्यवान गोष्टी आहेत – पाणी, अन्न आणि सुभाषिते, पण मूर्ख माणसे मात्र केवळ दगडांच्या तुकड्यांना रत्ने म्हणतात आणि त्यांच्या हव्यासापायी आयुष्य वाया घालवतात.

 

३)  संसारकटुवृक्षस्य द्वे फले ह्यमृतोपमे |

सुभाषितरसास्वादः सङ्गतिः सुजनैः स ||

 

अमृतापरी दोन फळे ही संसाराच्या कटु वृक्षाची,

सुभाषितांचा रसास्वाद अन संगत सज्जन, साधुजनांची.

 

अर्थ - सुभाषितकाराने संसाराला कटू – कडू वृक्ष म्हटले आहे. त्या वृक्षाची इतर सर्व फळे – म्हणजेच अनंत अडचणी, दुःखे - कडू असतात पण ती दुःखे, त्या अडचणी सुकर करू शकतील अशी दोनच अमृतासारखी फळे या वृक्षाला आहेत – एक म्हणजे सुभाषितांचा आस्वाद घेणे – म्हणजेच त्यांतून बोध घेऊन वागणे आणि दुसरे म्हणजे सज्जन, सत्प्रवृत्त, सदसद्विवेकी लोकांच्या संगतीत राहणे.

या तिसऱ्या सुभाषितात सुभाषितकाराने सज्जनांच्या संगतीत राहावे असे सांगितले आहे. हे सज्जन म्हणजे कोण, त्यांची लक्षणे काय, त्यांना कसे ओळखावे हे पुढच्या भागात
पाहूया.

 


मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

"पुढा स्नेह पाझरे" blog no. 2024/7

पुढा स्नेह पाझरे ---  








अहमदनगर मधील स्नेहालय आणि त्याचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी बहुतेकांना माहिती आहेत. त्यांचे अफाट कामही काही जणांना माहिती असेल. ज्यांना अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी www.snehalaya.org या त्यांच्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. 

स्नेहालयची माहिती सांगण्यासाठी या लेखाचा प्रपंच नाही, तर प्रत्येक भेटीत डॉ गिरीश कुलकर्णी यांचा एक वेगळाच पैलू दिसतो आणि आपले अचंबित होणे कसे थांबतच नाही हे मला सांगायचे आहे.

माझी मैत्रीण शुभांगी कोपरकर हिने स्नेहालयवर लिहिलेल्या ‘परिवर्तनाची पहाट’ या मराठी पुस्तकाचा मी हिंदी अनुवाद केला. ते पुस्तक ‘ परिवर्तन की प्रभात’ दि ५ जानेवारी २०१९ ला हिंदी साहित्यातील एक थोर व्यक्तिमत्व आणि पुणे विद्यापीठातील माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ केशव प्रथमवीर यांच्या हस्ते स्नेहालयमधेच प्रकाशित झाले. त्या समारंभासाठी शुभांगी आणि मी गेलो होतो.

शुभांगी आता स्नेहालयच्या पुण्यातील प्रकल्पाचे – स्नेहाधारचे काम बघते. त्याविषयी तिला गिरीश सरांशी काही बोलायचे होते त्यामुळे कार्यक्रम स्थळी जाताना ते आमच्या गाडीत आले. इतर गोष्टी बोलून झाल्यावर शुभांगी त्यांना म्हणाली, ‘ आपल्या एका देणगीदारांची मुलगी अमेरिकेत असते तिला मोठी देणगी द्यायची आहे. तर आता तुम्हाला कुठल्या विशेष गोष्टीसाठी मदत पाहिजे ते सांगितले तर त्या त्याप्रमाणे व्यवस्था करतील.’ मग गिरीश सरांनी सांगितले ‘सध्या पाण्याचा खूप प्रश्न आहे त्यामुळे बोअरवेल करायची आहे, काही इमारतींची डागडुजी करायला हवी आहे, मुलींच्या वसतिगृहाचे पत्रे खूपच खराब झाले आहेत.’ 

मी ऐकत होते. हे बोलणे कुठल्याही संस्थाचालकासारखे होते. पण गिरीश कुलकर्णी ही चीजच काही और आहे, यावर त्यांच्या पुढच्या वाक्यामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन कित्येक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या संस्था सुरु केल्या आहेत. त्यापैकी अजित कुलकर्णी याने अंध, मूक बधिरांसाठी ‘अनाम प्रेम’ नावाची संस्था सुरु केली आहे. गिरीश सर पुढे म्हणाले, ‘अनाम प्रेमला खूपच बेसिक गोष्टींसाठी पैशाची गरज आहे. त्या देणगीदारांना चालणार असेल तर स्नेहालय ऐवजी अनाम प्रेमला देणगी द्यायला सांगा.’ 

मला खरंच त्या क्षणी त्यांना साष्टांग नमस्कार घालावासा वाटला. स्वतःसाठी मागणे तर त्यांच्या कधी स्वप्नातही आले नसेल पण आपल्या संस्थेकडे येऊ पाहणारी एक मोठी रक्कम दुसऱ्या संस्थेला द्या असे सांगणाऱ्या माणसाला काय बिरूद लावायचे?

ज्ञानेश्वर माउलींनी तेराव्या अध्यायात ज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगताना म्हटले आहे त्याची आठवण झाली -

पुढा स्नेह पाझरे| माघा चालती अक्षरे|

शब्द पाठी अवतरे| कृपा आधी||

मंजिरी धामणकर





मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

ससा कासव शर्यतीची उरलेली गोष्ट blog no. 2024/6





 ससा कासव शर्यतीची उरलेली गोष्ट 

नमस्कार,

ससा कासव शर्यतीची गोष्ट लहानपणापासून आपण शेकडो वेळा ऐकली आहे. त्याचं तात्पर्य देखील आपल्याला चांगलं ठाऊक आहे. शर्यतीत कासव जिंकलं हे सर्वांना माहिती आहे. पण शर्यत हरलेल्या सशाचं पुढे काय झालं असावं हे सांगणारी ही उरलेली अर्धी गोष्ट नुकतीच वाचनात आली. लेखक माहित नाही पण खूप आवडली गोष्ट म्हणून सांगावीशी वाटली.  

   "सशाने वेगाने धावता धावता मागे वळून पाहिलं, कासव दूरवर कुठेच दिसत नव्हतं. शर्यत ठरल्यापासून कासव सतत, सावकाश, न थांबता शेकडो मैल चालण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल बढाया मारत होतं. सशाला त्याला दाखवून द्यायचं होतं की तोही शेकडो मैल धावू शकतो आणि तेही वेगाने. त्यामुळे शर्यतीच्या विचाराने त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. म्हणून झाडाची थंडगार सावली दिसल्यावर सशाने थोडा वेळ विश्रांती घ्यायची ठरवली.

 एक छानसा लांबटगोल दगड निवडून त्यावर मऊसूत गवत पसरून तो सशाने उशाला घेतला  आणि ताणून दिली. आजूबाजूला पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, थोड्या अंतरावरून वाहणाऱ्या ओढ्याचा खळाळ - सतत वेगाने धावण्याच्या उन्मादात आजूबाजूच्या इतक्या सुंदर जंगलाकडे त्याने कधी नीट पाहिलंच नव्हतं. सगळच वातावरण इतकं सुखद होतं की लगेच त्याचा डोळा लागला.

 त्याला स्वप्न पडलं की एका लाकडाच्या ओंडक्यावर झोपून तो ओढ्यातून वाहत चालला आहे. किनाऱ्याजवळ आल्यावर त्याला एक लांब दाढी असलेले साधू महाराज दिसले.  त्याच्याकडे बघून हसून त्यांनी विचारलं,

साधू -  ‘ कोण आहेस बेटा तू?’

ससा  - ‘ मी ससा आहे महाराज आणि मी कासवाशी शर्यत लावली आहे.’

 साधू  -‘ ती का बरं?’

 ससा - मी सगळ्यात वेगाने धावू शकतो हे सिद्ध करण्यासाठी.’

साधू  -- ‘ ते कशासाठी सिद्ध करायचं?’

ससा - म्हणजे काय! सरळ आहे. त्यामुळे मला पदक मिळेल, सन्मान मिळेल आणि सर्वात जास्त वेगाने धावणारा म्हणून माझ्यानंतरही माझं नाव घेतलं जाईल.’

 साधू  - ‘ पन्नास – शंभर वर्षांपूर्वी सर्वात वेगाने धावणाऱ्या हरणाचं नाव, किंवा सर्वात मोठ्या हत्तीचं, किंवा सर्वात बलशाली सिंहाचं नाव तुला माहिती आहे का?’

ससा -- ‘ अं --- नाही महाराज.’

साधू - ‘ आज तुला एका कासवाने आव्हान दिलंय, उद्या एखादा साप देईल, परवा झेब्रा. मग काय ‘ मी सगळ्यांपेक्षा जास्त वेगाने धावतो हे सिद्ध करण्यासाठी तू आयुष्यभर शर्यतच लावत राहणार?’

ससा - ‘ हं – हा विचार मी कधीच केला नव्हता.’

साधू  -- ‘ तर मग आता कर. शर्यत विसर. तुला आयुष्यात कशाने आनंद मिळतो हे शोध आणि ते कर.’

 सशाला जाग आली. त्याला खूप शांत वाटत होतं. तो निवांतपणे चालू लागला. वाटेत भेटणारा प्रत्येकजण विचारत होता, ‘ अरे तू इथे काय करतो आहेस? शर्यत लावली होतीस ना? कासव जिंकलं की. तू हरलास.’

ससा हसून म्हणाला, ‘ कासवाला त्याचा विजय लखलाभ. मला आता कोणतीच शर्यत लावायची नाही. मला शांतपणे माझं काम करत, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आयुष्य जगायचं आहे.’

गोष्ट मी लिहिलेली नसली तरी त्यातून माझं जे विचारचक्र सुरू झालं ते असं- 

मूळ गोष्टीपेक्षा या गोष्टीचं तात्पर्य अगदी वेगळं. पण विचार करायला लावणारं आहे, हो ना?

प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शर्यतीत धावतो आहे- ऊर फुटेस्तोवर. परीक्षेतले मार्क, पद, प्रतिष्ठा,पैसा, प्रसिद्धी, गाडीचं, फोनचं मॉडेल, वाहनांचा वेग - अगदी सगळ्या सगळ्या गोष्टींत 'मी कसा सगळ्यांच्या पुढे जाईन ही चुरस. 

आता त्यात भर पडली आहे सोशल मीडियाची. फॉलोअर्स,सब्स्क्राइबर्स,व्ह्यूज, यांत चढाओढ. त्यासाठी रील्स बनवताना, सेल्फी घेताना जिवाचीही पर्वा नाही. मी इतरांपेक्षा आघाडीवर राहिलं पाहिजे- बस्स! कुठे जाणार आहोत आपण ही आघाडी घेऊन? लाख मोलाचा जीव असल्या क्षुल्लक स्पर्धेसाठी पणाला लावायचा? जे मिळवण्यासाठी इतका आटापिटा चालला आहे, ते मिळालं तर त्याचा उपभोग घ्यायला तरी वेळ आहे का? 

लहानपणी आजीकडून एक गोष्ट ऐकली होती. 

एका माणसाजवळ खूप अंथरूणं - पांघरुणं होती. त्याला वास्तविक एकच पुरणार होतं पण त्याला वाटलं सगळ्याचा उपभोग घेऊ. म्हणून तो सगळी अंथरूणं घालत बसला. शेवटचं घालेपर्यंत सकाळ झाली. त्याला झोपायलाच मिळालं नाही. 

विचार करू या. जाऊ दे कासवाला पुढे. आपण आनंदाचे क्षण वेचू या. 

   मंज़िलें मिलीं नहीं, तो चलो, रास्ते बदल लेते हैं

    वक़्त बदला नहीं, तो चलो, ख़्वाहिशें बदल लेते हैं,

    समय किसी के लिए रुकता नहीं,

    जो मिला है, चलो, उसीको संवार लेते हैं||

वाचकहो, पटलं,आवडलं तर कॉमेंट बॉक्समधे तसं नक्की लिहा. 

आणखी कुठल्या विषयाबद्दल वाचायला आवडेल तेही लिहा. मी नक्की लिहायचा प्रयत्न करीन. 

आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

                                आणखी एक ( किती?) बळी! “ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण क...